किल्ले वाफगाव – Wafgaon Fort,
ता.खेड जि.पुणे(महाराष्ट्र)
इतिहास :
होळकरांच्या वैभवशाली इतिहासाचे उदाहरण म्हणजे वाफगावचा भुईकोट किल्ला (Wafgaon Fort) होय. हा किल्ला श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांना जुन्नर प्रांतातील वाफगावची जहागिरी मिळाल्यानंतर सन १७४९ च्या दरम्यान या भुईकोटाचा निर्माण केला. असे सांगितले जाते कि, सुभेदार मल्हारराव होळकर यांनी एकाच वेळी ६ ठिकाणी ६ किल्लेसदृश्य भुईकोटांचे बांधकाम सुरु केले होते, त्या ६ पैकी वाफगावचा भुईकोट हा एक होय. हा किल्ला श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर(प्रथम) यांचे जन्मस्थान आहे.
अन्य Post हि वाचा :

या भुईकोट किल्ल्यातच सुभेदार मल्हारराव होळकर यांची जेष्ठ कन्या उदाबाई होळकर यांचा विवाह होळकरांचे सरदार बाबुराव वाघमारे-पाटील यांच्याशी झाला होता व त्यानंतर सरदार बाबुराव वाघमारे व उदाबाई यांना येथून ३० कि. मी. अंतरावर असलेल्या खडकी-पिपळगाव (ता.आंबेगाव जि.पुणे) येथील वाडा व जमिनीची जहागीरदारी आंदण स्वरूपात देण्यात आली होती. तेथे आजही उदाबाई यांची समाधी, हत्ती दरवाजा, नदीघाट व आदी असंख्य होळकर कालीन वास्तू उपेक्षित अवस्थेत आहेत.
या भुईकोट किल्ल्यात श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर, राणी अहिल्यादेवी होळकर (Ahilyabai Holkar), श्रीमंत सुभेदार तुकोजीराव होळकर(प्रथम) Tukojirao Holkar, श्रीमंत महाराजाधिराज यशवंतराव होळकर(प्रथम) यांनी अनेक वेळा दक्षिण मोहिमांच्या दरम्यान मुक्काम केला आहे तसेच या किल्ल्यात पूर्वी होळकरांची टाकसाळ हि होती. सध्या हा भुईकोट किल्ला रयत शिक्षण संस्थेला बक्षीस रुपात दिला आहे. या किल्ल्यावर रयत शिक्षण संस्था वाफगाव याचे नियंत्रण असते.
किल्ल्यात पाहण्याची ठिकाणे :
किल्ल्याच्या आत राजदरबार, राजमहाल, अंधारी विहीर (बुरुजातील विहीर), होळकर कालीन तोफा, काही मंदिरे (विष्णू-लक्ष्मि, विष्णूपंच्याती, मांगीर बुवा), बावडी, राजमहालाची तटबंदी, होळकर कालीन भव्य गुफा तसेच किल्ल्याच्या बाहेरील असलेले राजराजेश्वराचे मंदिर पाहण्यासारखे आहे. पूर्वी गावाला तटबंदी होती मात्र आज तटबंदी काळाच्या ओघात नष्ट झाली आहे मात्र मुख्य वेस आजही शाबूत आहे व त्याचे नामकरण “अहिल्याबाई होळकर वैभव स्मृती” असे केले आहे. गावाच्या पूर्वेस नदी आहे व नदीच्या पात्रात राणी अहिल्यादेवी निर्मित एक दगडी बारव आहे तसेच नदीच्या पलीकडे चिंचेचा मळा आहे त्या भागात एक सुंदर कमानीयुक्त बागांची विहीर आहे. गुळवणी बारव, सिद्धेश्वर, तपणेश्वर, नागेश्वर, उद्धेश्वर शिव मंदिर. उदाईमाता मंदिर.
किल्ल्याची माहिती :
हा किल्ला एकूण ८ एकर जागेत विस्तीर्ण असून या किल्ल्याच्या बांधकामात घडीव दगड व विटांचा उपयोग केला आहे. या किल्ल्याला एकूण ७ बुरुज असून प्रत्येक बुरुजावर खिडक्या व छरी आहेत. तोफ किवा बंदुका यांचा शत्रूवर मारा करायला यावा या उद्देशाने या खिडक्या व छरी बुरुजावर आहेत.


किल्ल्याचे प्रमुख प्रवेशद्वार हे मजबुत दगडात असून दारांवर लोखंडी अणुकुचीदार सुळे आहेत. हे लोखंडी अणुकुचीदार सुळे पट्ट्यानवर मजबूत बसवलेले आहेत. हत्तीच्या साहाय्याने शत्रूने दार तोडू नये म्हणून अशा प्रकारे सुळे दारावर बसवले जात.
प्रमुख प्रवेशद्वारतून आपुन जेव्हा आत प्रवेश करतो तेव्हा समोर लगेच आपल्याला राणीमहालाची तटबंदी आडवी दिसते व त्यावर तीन देवळ्या किंवा खिडक्या दिसतात. असे बांधकाम करण्याचा उद्देश हा असतो कि जर कधी क्षत्रूने प्रवेश केला तर लगेच त्याला वाड्यात प्रवेश मिळू नये. त्याची वाट अडऊन त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच ते तीन देवळ्या किंवा खिडक्या कशासाठी असतील?


त्यावर असलेले तीन देवळ्या
मुख्यदार व राणीचा महाल तटबंदीची रचना समजेल
तर जेव्हा शत्रू या प्रवेशद्वाराने आत येऊन तटबंदी मुळे थांबला जातो त्याच क्षणी त्या देवळ्यात असलेल्या तोफांमधून क्षत्रू वर मारा केला जातो. हि एक संरक्षणाच्या दृष्टीने केलेली रचना असते. त्यामुळे अशा प्रकारची रचना आपल्याला बऱ्याच भुईकोटामध्ये बघायला मिळते.
पुढून उजव्या हाताला वळाले कि, राणीमहालाचे प्रवेशद्वार दिसते. राणीमहाला ला एकच प्रवेशद्वार असून आकाराने खूपच लहान आहे. हा राणीमहाल बंदिस्त तटबंदीत असून दुमजली बांधण्यात आलेला आहे. राणीमहालाच्या आत होळकर कालीन सुबक लाकडी काम पाहवयास मिळते. तसेच या महालाच्या दुसऱ्या मजल्यावर जात असताना विष्णूपंच्याती हे मंदिर लागते. या मंदिरातील सर्व मुर्त्या संगमरवरी असून त्या राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या विद्यमानाने स्थापन झालेल्या आहेत.




या सारख्या मुर्त्या आपल्यालाला महेश्वरच्या किल्ल्यावर बघायला मिळतात. हा महाल स्थानिक लोक “राणीचा महाल” म्हणून ओळखला जात असे. राणीमहालाच्या दुसऱ्या मजल्यावरील होळकरकालीन लाकडी कलाकुसर पाहण्यासारखी आहे. आजच्या घडीला तेथे शाळेची लायब्ररी आहे.
या राणी महालाच्या समोर एक होळकर कालीन भव्य बारव स्थित असून या बारवेची निर्मिती राणी अहिल्यादेवी होळकर यांनी केली. या बारवेच्या तळापर्यंत पायरया असून कमानच फक्त विटांमध्ये आहे. बारवेचा आकार इंग्रजीतील उलट “L” प्रमाणे असून सर्व बांधकाम हे दगडात आहे. या बारवेच्या बाजूलाच विष्णू-लक्ष्मि यांचे मंदिर स्थित आहे. हे मंदिर होळकराच्या धर्मनिरषेपचे उत्तम उदाहरण आहे कारण हे मंदिर मजिद सारखे दिसायला आहे.

पुढून डाव्या बाजूला ओळावे लागते

या मंदिरासमोरच आंधरी विहीर(बुरुजातील विहीर) असून हि विहीर किल्ल्याच्या एका बुरुजात स्थित आहे. या विहिरीच्या तळाला अंधार असून खूप गार वाटते तसेच या विहिरीत प्रकाश येण्यासाठी वरील बाजूने व्यवस्था केली आहे. या विहिरीच्या पाण्याचा आजही पिण्यासाठी उपयोग होतो. अंधारी विहीर किंवा बुरुजातील विहिरीचे फोटो व माहिती वाचण्यासाठी भेट द्या. अंधारी विहिरीचा उत्तम रचना कशी आहे याबद्दलचा खाली असलेला Video नक्की बघा.

यावरून तुम्हला तिच्या रचनेचा अंदाज येईल.


येथून आपल्याला थेट वाड्यातील भव्य राजदरबार दिसतो. त्याकडे आपण जात असताना मध्येच आपल्याला एक तळघर दिसते. मात्र मित्रांनो ते फक्त तळघर नसून जमिनीच्या आत शत्रूला कळू नये म्हणून असलेल्या एक भुयारी बालेकिल्लाचे प्रवेशद्वार म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या भुयारी मार्गातून आत उतरल्यावर सध्या काही खोल्या नजरेस पडतात व अशा असंख्य खोल्या आत आहेत. पूर्वी येथे होळकरांची टाकसाळ होती. खोल्यांची संख्या हि १४२ असून प्राचीन काळातील मंदिर हि आहे असे सांगितले जाते.


बाजूला विष्णू-लक्ष्मी मंदिरा शेजारी जी बारव आहे त्या बारवेची जेवढी खोली आहे तेवढेच हे भुयारी काम जमिनीच्या आत आहे. या बारवेतील पाणी थेट या भुयारी कोटातील टांकसाळेत, खोल्यामध्ये जाण्याची खास व्यवस्था केली होती. तसेच या भुयारी कोटात अनेक गुप्त मार्ग आहेत ते राजगुरूनगर, खडकी, काठापूर च्या वाड्यात निघतात अशी माहिती मिळते. आजच्या घडीला हे भुयारी कोटाचे द्वार शाळेकडून कचरा टाकून बुजवण्याचे काम चालू आहे.
या किल्ल्याचे सर्वात आकर्षण हा राजदरबार आहे. राजदरबारचे बांधकाम हे तिनमजली असून या मध्ये दगड व विटांचा उपयोग केलेला आहे. राजदरबारात प्रवेश करण्यासाठी एकच प्रवेशद्वार असून ते नेहमी बंद केलेले असते. यामध्ये प्रवेश करण्यासाठी बाजूलाच राजदरबाराच्या तटबंदीला एक भगदाड पडलेले आहे त्यातून नेहमी ये जा केली जाते. आता हे भगदाड पडलेले आहे? का पाडलेले आहे? हे मात्र कळत नाही. येथून आत गेल्यावर तब्ब्ल १-२ एकरावर असलेला संपूर्ण राजदरबार नजरेस पडतो.


डोळ्यांची प्रारणे फेडणारे हे दृश्य आहे. राजदरबाराचे तिनमजली बांधकाम, त्यामधील देवळ्या किंवा खिडक्याची आकर्षक व शिस्तबद्ध मांडणी, तटबंदी, चपट्या विटांचे बांधकामधील सज्जा नजरेस पडते. पश्चिम बाजूला सिहासनाची किंवा प्रमुख व्यक्तींची बसण्याची जागा दिसते. दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी चारी बाजूला चार मार्ग असून या राजदरबारावरच होळकरांचे बांड निशाण फडकवण्याची जागा आहे.






राजदरबारामध्ये मुख्य प्रवेश द्वाराशेजारील तटबंदीवर एक गोल आकारात व त्याच्या वर सरळ रेषेत नृत्य करत असलेले शिल्प नजरेस पडते. यातील सरळ रेषेत नृत्य करत असलेल्या शिल्पांचा अर्धा भाग गायब झाला असून, गोल आकारातील नृत्य करत असलेल्या शिल्पाचीही सध्या दूरवस्था आहे. पूर्वी गोल शिल्पांच्या वरील जे सरळ रेषेतील शिल्प दिसत आहे तेथे वेगवेगळ्या रंगाच्या छोट्या ज्योती लावल्या जात होत्या. या शिल्पाच्या वरील बाजूस म्हणजेच राजदबाराच्या तिसऱ्या मजल्यावर पाण्याच्या टाक्या आहेत. या टाक्यातील पाणी ज्योतीपासून विशिष्ट अंतर ठेऊन खाली पडत असत त्यामुळे त्या पाण्याच्या पडद्याला ज्योतींचा वेगवेगळे रंग प्राप्त होत.


बारकाईने पहिले तर या शिल्पात पुरुष व स्त्रिया नृत्य करताना दिसतात. जेव्हा कधी शाही कार्यक्रम या दरबारात असत तेव्हा येणाऱ्या मंडळींच्या स्वागतासाठी या पडदा करंज्या प्रवेशद्वारशेजारी सुरु केल्या जात असत. आता या दरबाराच्या तिसऱ्या मजल्यावर पाणी कोठून येत असेल? तर या वाड्यापासून १ कि.मी दूर, वाफगाव-लोणी मार्गावर टेकडी आहे व तेथे होळकरकालीन तलाव निर्माण करण्यात आला, जो “हत्ती तलाव” या नावाने ओळखला जातो. त्या तलावातील पाणी खापरी मार्गाने येथील राजदरबराच्या तिसऱ्या मजल्यावर आणण्यात आला आहे. याबद्दल चा खाली असलेला Video नक्की बघा.
होळकरकालीन राजमहलातील पाणीव्यवस्था लक्षात येईल

पाण्याचे खापरी पाट, तटबंदी, देवळ्या

राजदरबाराच्या आत असलेल्या या खिडक्यांना व तटबंदीला खूप तडे गेले आहेत. काही ठिकाणी खूप मोठं मोठे भगदाड पडलेले आहेत. काही ठिकाणी विटांचे खांब गायब झाले आहेत. तटबंदीला चिरा हि गेल्या आहेत. एकंदरीत राजदरबार पडण्याची स्थितीत आहेत असे चित्र आहे. राजदरबाराचे आतील द्वार हे सिमेंटने कायमचे बंद केलेले आहे.



बंद करण्याचे कारण असे कि या राजदरबारात “पक पक पकाक” या चित्रपटाचे शूटिंग सुरु होते व येणारी लोकांची गर्दी थोपवण्यासाठी हे मुख्य दार आतून कायमचे बंद केले गेले आणि तटबंदीला भगदाड ये-जा करण्यासाठी पाडले. या असल्या गोष्टी एकूण व पाहून इतिहास प्रेमीना जरूर दुख होते.




राजदरबाच्या पाठीमागेल बाजूला भुईकोटाचा दुसरे द्वार बघायला मिळते. हे द्वार मुख्य द्वारच्या मानाने छोटेसे पण मजबूत आहे. किल्ल्यात दोन होळकर कालीन तोफ हि बघायला मिळतात. त्या सध्या सिमेंटमध्ये घट्ट बसवण्यात आल्या आहेत.




सन २०१९ ला शाळेच्या नवीन इमारतीच्या नावाखाली राजदरबाराच्या बाजूला मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले होते. त्याकामाला मोठ्या प्रमाणात विरोध झाल्यानंतर तूर्तास स्थगिती देण्यात अली आहे. या आधी हि असे खोदकाम करताना काही होळकरकालीन वास्तू मिळाल्या होत्या. त्यामध्ये हत्तीची वास्तू पाहण्यासारखी आहे.
खोद कमाविरुद्ध उचलेले पाऊल
या किल्ल्याच्या बाहेर राजराजेश्वराचे मंदिर आहे. हे मंदिर हेमाडपंथी स्वरूपाचे असून या मंदिराचा निर्माण राणी अहिल्यादेवी होळकर यांनी केलेला आहे. या मंदिरासमोर दगडी मेघडबरीमध्ये नंदीचे भव्य वास्तू स्थित असून नंदीच्या गळ्यातील घंटा व रेखीव काम सुरेख आहे. हे मंदिर हि बंदिस्त स्वरुपात आहे. राजराजेश्वराचे मंदिराची अधिक माहिती वाचण्यासाठी येथे Click करा.
या व्यतिरिक्त राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या काळात (१७६७-१७९५) चार शिव मंदिरांचा निर्माण करण्यात आला. चार हि शिव मंदिराच्या उदरनिर्वाहासाठी अहिल्यादेवींनी प्रत्येकी ५० एकर जमीन लावून दिली व मोकळ्या जागेत चिंचेच्या झाडांची लागवड केली. चार शिवमंदिरांची नावे पुढीलप्रमाणे आहेत, सिद्धेश्वर, तपणेश्वर, नागेश्वर, उद्धेश्वर शिव मंदिर. पूर्वीच्या काळी सर्व वाफगावालाच दगडी तटबंदी होती मात्र आज काही अवशेष व बुरुज नजरेस पडतात. अहिल्यादेवींच्या नावाने असलेली वेस हि तटबंदीची प्रमुख वेस होती.


वाफगावच्या शिवारात दोन मोठ्या होळकरकालीन बारव आहे. त्यांचा उल्लेख न करता वाफगावचा इतिहास पूर्ण होऊच शकत नाही. या दोन्ही बारव भुईकोटापासून काही अंतरावर असून, पहिल्या बारवेला स्थानिक लोक “बागाची बारव” म्हणतात तर दुसऱ्या बारवेला “गुळवणी बारव” म्हणतात. या बारवांना अशी नावे असण्यामागे काही लोककथा आहेत. बागाची बारवे शेजारी चिंचेची बाग होती व त्या बागेला या बारवेमधून पाण्याचा पुरवठा केला जात असे त्यामुळे त्या बारवेला “बागाची बारव” म्हटल जाऊ लागलं. या बारवेचा घेरा खूप मोठा असून तळापर्यंत रुंद पायऱ्या आहेत. बारवेचे काम दगड व चुन्यात असून देवळ्या, सज्जा, दगडी कमानी व मोटेची व्यवस्था बघायला मिळते. या बारवेचा हि सिन पक पक पकाक या चित्रपटात आहे.
गुळवणी बारवेची कथा तर खूपच रंजक आहे. सुभेदार तुकोजीराव होळकर यांचे पुत्र विठोजीराव होळकर यांचा विवाह या किल्ल्यात झालेली नोंद मिळते. या लग्नात होळकर राजघराण्यांकडून एक विहीर भरून गुळवणी करण्यात अली होती म्हणून त्या बारवेला “गुळवणी बारव” म्हटलं जाउ लागलं. विठोजी होळकर कोण? ज्यांची सन १८०२ ला पेशव्यांनी शनिवार वाड्यापुढे हत्तीच्या पायदळी देऊन हत्या केली होती व त्यांनतर महाराजा यशवंतराव होळकर पुण्यावर चालून आले व रक्तरंजित लढाईत विजयी झाले. या बारवेचा घेरा खूप मोठा असून तळापर्यंत रुंद पायऱ्या आहेत. बारवेचे काम विटा व चुन्यात असून तळापर्यंत जाणारा मार्ग खूपच अरुंद आहे. या बारवेची बांधणी इतर बारवांच्या तुलनेने खूपच वेगळी आहे. एकावेळी एकच माणूस या बारवेत ये-जा करू शकतो. कधी हा भुईकोट बघायला आला तर या दोन्ही बारवा नक्की बघायला या.



कसे यावे :
पुणे वरून तुम्ही राजगुरुनगर एस.टी किंवा खाजगी वाहनांनी सहज येऊ शकता. राजगुरुनगर पासून १२ कि. मी. अंतरावर वाफगाव आहे. तेथे जाण्यासाठी एस. टी बसची सुविधा आहे. वाफगावच्या प्रमुख ठिकाणी उतरल्यावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैभव स्मृती असे लिहिलेली वेस नजरेस पडते. तेथून काहीच अंतरावर किल्ला आहे. किल्ल्याच्या प्रमुख प्रवेश द्वरावर शिक्षण संस्थेचे नाव लिहिलेले दिसते(महाराजा यशवंतराव होळकर विद्यालय,वाफगाव).
इतर :
“पक-पक-पकाक” या मराठी चित्रपटाचे ७०% शुटींग व “पिपाणी” या मराठी चित्रपटाचे १००% शुटींग या किल्ल्यामध्ये झाले आहे. सन २०११ पासून दरवर्षी या किल्ल्यामध्ये जय मल्हार सेना यांच्या वतीने श्रीमंत महाराजाधिराज यशवंतराव होळकर यांची जयंती ३ डिसेंबर ला साजरी करण्यात येत आहे. त्यामुळे मराठ्यांच्या इतिहासात अज्ञान राहिलेल्या या राजाला वंदन करण्यासाठी जीवनात एकदा तरी अवश्य या जयंतीला उपस्थित रहा.
ऐतिहासिक संदर्भ व आभार:
इंदोर स्टेट गॅझियट भाग – १,
श्री. डोंगरे(माजी सरपंच, वाफगाव),
श्री. पप्पूराजे उर्फ योगेश होळकर(वाफगाव).
काही शंका किंवा सूचना असल्यास संपर्क करा.
[email protected]
- राणी अहिल्यादेवी होळकर यांचा मुरूम येथील शिलालेख - November 8, 2022
- इंदोरमधील होळकरांची समाधीस्थळे – छत्री मंदिरे - April 5, 2022
- अहिल्यादेवी होळकर कालीन डाक व्यवस्था - December 31, 2021
का असे केलं असावं ?. एखादे ऐतिहासिक स्थळ एखाद्या संस्थेला का देण्यात यावं.या स्थळाची डागडुजी व सुव्यवस्थित ठेवण्यासाठी खर्च करायचं सोडून सरळ तुम्ही शाळा म्हणून वापरता.ही वास्तू होळकर संस्थानाच्या वांशजांकडे का नाही दिली गेली नाही..कोणीही असो यामध्ये त्यांचा निषेध असो….
खरच किती दुर्दैव आहे. एवढा मोठा किल्ला आहे . आणि तो एका शाळे मध्ये रुपांतर केले आहे.
असो. पण ते वेवस्थित ठेवणे आणि त्याचे पवित्रे जपणे काम होते.
मी वाफगाव व पिंपळगाव वाड्यावरील लेख वाचले ..मी तीन वेळा यशवंतराव कार्यक्रमानिमित्त वाफगावला आलो होतो ..संजयजी सोनवणी यांची भाषणे ऐकली ..मी स्वतः अहिल्यादेवींना खूप मानतो ..भारतातील अत्युच्च कोटीची ही राणी होती ..परंतु सनातनी शहाणपणामुळे दुर्लक्षित राहिली याचे दुःख आहे ..
वरील सर्व वाड्यांच्या मालकीवर पहिल्यांदा स्टे देणे अत्यंत आवश्यक आहे …म्हणजे राहिले ते सांभाळता येईल …प्रत्यक्ष कृृती आवश्यक आहे ..
होळकर घराण्यातील महान व्यक्तींचे पराक्रम शौर्यगाथा याबद्दलचे संशोधन रयत शिक्षण संस्थेने करावे व होळकर घराण्याचा जाज्वल्य व दैदिप्यमान इतिहास जगासमोर आणावा.