Skip to content

सुभेदार तुकोजींची उत्तरेकडील कामगिरी(१७६९-७२)

मराठ्यांनी १० फेब्रुवारी १७७१ रोजी दिल्ली काबिज केली

१० जुन १७६८ ला पेशवे माधवरावांनी घोडप येथे रघुनाथरावांचा पराभव करुन त्यांना पुण्यात नजर कैदेत ठेवले. जानोजी भोसल्यांचा पराभव होऊन १७६९ च्या कानकपूरच्या तहाने जानोजीराव भोसले यांच्या वर पेशव्यांनी जबर बसवून वेळप्रसंगी पेशव्यांना मदत करण्याचे वचन मिळविले. निजाम मित्र बनला होता. हैदरखान वर ही जवळपास नियंत्रण प्रस्थापित करण्यात माधवराव यशस्वी झाले होते. इ.स. १७६९ पर्यंत पेशवे माधवरावांची दक्षिणेच्या कटकटीतून बरीच सुटका झाली होती.

श्रीमंत माधवराव पेशव्यांचे स्वप्न दक्षिणेपूरतेच मर्यादित नव्हते तर उत्तरेतही मराठयांचा प्रभावं पूर्ववत प्रस्थापित करण्याचा होता आणि म्हणुन पेशवे माधवरावांनी दक्षिण कामगिरी स्वतः स्वीकारुन उत्तरेच्या कामगिरीवर रामचंद्र गणेश कानडे आणि विसाजी कृष्ण बिनीवाले यांच्या नेतृत्वात इ.स. १७६९ च्या एप्रिल महिण्यात एक मोठी सेना रवाना केली. त्यांच्या मदतीला तुकोजीराव होळकर आणि महादजी शिंदे उत्तरेस रवाना होतात. तत्पूर्वी २८ सप्टें. १७६७ रोजी सखाराम बापू तुकोजीराव होळकरास लिहितात “महादजी शिंदे यास घेऊन लांब लांब मजला करीत यावे”( ६ मे १७६८). महादजी शिंदे तुकोजीस लिहितात “आपण व आम्ही समागमेच हिंदुस्थानात जाऊ”.

पानीपतनंतर काही काळ मराठे व अब्दाली दोघेही दिल्लीच्या राजकाराणातून निवृत्त होताच जाट, रोहिले व वजीर सुजाउद्योला यांनी या संधीचा फायदा करुन घेवून दिल्लीच्या राजकारणातून मराठयांचे कायम उच्चाटण करुन आपले वर्चस्व स्थापण्याचा प्रयत्न सुरु केला. यावेळी बादशाहा शहाआलम अलिगोहर हा ब्रिटिशांचा अंमलाखाली अलाहाबाद येथे असहाय्य आणि असंतुष्ट होता. मराठयांनी सरळ दिल्लीपर्यंत चाल करुन राजधानी ताब्यात घ्यावी असा आदेश माधवराव पेशव्यांचा विसाजी कृष्ण बिनीवाले हयांना दिला होता.

रामचंद्र गणेश कानडे आणि विद्याजी कृष्ण बिनीवाले हया दोघामध्ये माळव्यात लष्कर आल्यापासून चुरस वाढत चालली होती. प्रत्येक गोष्टीत यांची हमरीतुमरी चाले. उत्तरेत आल्यावर रामचंद्र गणेश कानडे व होळकर, शिंदे या तिघांनी तीन कार्यक्रम वाटून घेतले. कानडे बुदेलखंडाकडे वळले, होळकर बुंदी कोट्याकडे व शिंदे उदयपूरकडे. आपआपल्यापरी खंडणी वसुलाकडे ही मंडळी गुंतली होती. उत्तरेत मराठी फौजा पोहोचताच जाट राजा नवलसिंगनी याला विरोध करण्यास सुरुवात केली.

यावेळी तुकोजीराव व महादजीत मतभेद निर्माण झाले. (१४/०५/१७६९) त्रिबंक शिवदेव लिहितो, “शिंदे होळकर उदयपूराकडे आहेत. उभयतांचे चित्त शुध्द नाही”. महादजीने राणारतन सिंहाचा पक्ष घेतला. तुकोजीराव यांनी राणा आरसीकडुन खंडणी साडे चौसष्ट लक्ष करार केली. रतनसिंहास सव्वालक्षाचा वाटा द्यावा व महादजीस पाच लक्षाचा घाटा द्यावा याप्रमाणे करार केला. होळकरांचा सरदार खंडूजी अरगडे लिहितो(०४/१२/१७६९), “बुंदीकोटयाचे प्रकरण बारा लक्षपर्मत चुकणार आहे”. पुढे जाटाचे मुलुखात जाऊ. जाटाचे पारपत्य केल्यास माधवसिंग पन्नास लाख व बादशहा पन्नास लाख देण्यास तयार आहे.

जाटाने आमचे तोंडावर विस हजार फौज पाठविली आहे. जाटाचे पारिपत्य करण्यास इ.स. १७६९ च्या अखेरीस सर्च फौजा निरनिराळया कामगि-या आटपून चंबळवर एकत्र होऊन जाटाचे मुलुखात शिरल्या. दि. ५ एप्रिल १७७० रोजी गोवर्धन येथे जाट आणि मराठे हयांच्यात झालेल्या लढाईत जाटांचा निर्णायक पराभव झाला. त्यांची संपूर्ण फौज लुटल्या गेली. नवलसिंगाकडे मिस्टर सुमरु व फेंच जनरल मांडेल हे युरोपियन अंमलदार होते. हयांचा सुभेदार तुकोजीरावांनी पराभव केला. जाटाचे खंडणीचा करार पासष्ट लाख दरबार खर्च मिळून झाला आहे. परंतु सरकारातून मामलत झाल्यामुळे होळकर आजुदे आहेत. शिंदे यांचे मत मामलत करावयाचे आहे. नबलसिंग जाटाच्या पराभवामुळे मराठयांच्या मार्गातील एक महत्वाचा काटा नाहिसा झाला. त्यानंतर लगेचच मराठयांनी आग्रा आणि मथुरा ही ठिकाणेही हस्तगत केली.

मराठयांच्या उत्तरेतील आगमनामुळे नजीबखान घाबरला. पानिपतच्या पराभवाचा मराठे बदला घेतील या भीतीपोटी त्याने सुभेदार तुकोजीराव होळकर यांच्या मार्फत मराठयांशी मैत्री केली. नजीबचा होईल तितका उपयोग करुने नंतर पारिपत्य करावे असे तुकोजीराव व विसाजीचे मत होते तर नजीबचे पूर्णपणे पारिपत्य करावे असे महादजी व रामचंद्र गणेशाचे मत होते. शेवटी पेशव्यांचे विचारे ठरले की नजीबशी कायमची दोस्ती करु नये. दिल्लीच्या मसलतीत त्याचा शक्य तितका उपयोग करुन घ्यावा आणि मागाहुन त्यास जेर करावे. एप्रिल १७७० मध्ये मराठे यमुना ओलांडून अहमदखान बंगशाच्या प्रदेशात शिरले. ह्यावेळी सुध्दा नजीबखान अहमदखान बंगश हयांचेशी संघान साधुन मराठयांचा पात करण्याच्या गुप्त कारावाया करीतच होता.

रंतु हयावेळी मराठे पूर्वानुभवाने सावध झाले होते. चारही बाजुंनी पठाणांचा वेढा पडण्याची शक्यता दिसताच मराठे य॒मुनपर्यंत परत आले. दि. ३१ ऑक्टोंबर १७७० रोजी नजीबखानाचा मृत्यु झाला. त्याचा मुलगा झबेताखान हा पित्याची संपत्ती आणि सत्ता हयांचा वारस झाला. झबेताखानाने बादशहा शहाआलम कडुन मीरबक्षीचे पद जबरीने मिळवून घेतले आणि हया अधिकाराच्या बळावर दोआबात त्याने मराठयावर चाल केली. मराठयांनी पूर्ण सहकार्याने बंगश आणि रोहिल्याविरुध्द लष्करी कारवाई केली. इटावा हस्तगत करून दि. १५ डिसेंबर १७७० रोजी त्यांनी फरुकाबाद ताब्यात घेतले. मराठयांना तोंड देणे अशक्य होऊन अहमदखान बंगशाने प्राणाची भीक मागत पानिपत युध्दापूर्वीचा मराठयांच्या ताब्यात असलेला दोआबातील सर्व प्रदेश परत त्यांना दिला.

हया् मुळे दोआबात मराठयांची सत्ता आणि प्रतिष्ठा प्रस्तापित झाली. याप्रमाणे जाट, रोहिले नामोहरण झाले. नजीबउद्योला व बंगश मृत्यु पावले. इंग्रज कंपनी सरकार तटस्थ राहिले आणि मराठयासमोर उभे राहण्यास कोणीही राहिला नाही.

“मराठयांच्या मदतीने बादशहा ६ जानेवारी १७७२ ला दिल्ली तख्तावर बसला”

जाट आणि रोहिले हे मराठयांचे प्रमख दोन शत्रु. हयांच्या सत्तेला पायबंद बसला आणि त्याचबरोबर बादशहाला दिल्लीत परत आणून दिल्लीवर ताबा मिळविण्याकरिता मराठयांचा मार्ग मोकळा झाला. नजीबखानाच्या निधनानंतर मिर्झा नजफखान हा दिल्लीच्या कारभारात प्रमुख झाला. मराठयांच्या नेतृत्वात ब्रिटिशाविरुध्द उत्तरेच्या सत्ताधिशांची युती होऊ न देण्याचा प्रयत्न ब्रिटिशांचा होता. तशी युती बादशहा भोवतीच केंद्रित होऊ शकेल हयांची जाणीव असल्यामूळे अलाहाबाद येथे बादशहा आलम हयाला इंग्रजांनी आपल्या नियंत्रात ठेवले होते.

इंग्रजांच्या भरवश्यावर दिल्लीत जाळून आसन स्थिर करण्यात अर्थ नसल्याची कल्पना बादशहाला आली. शिवाय बादशहाची मातोश्री झीनतमहलने ही गारद्यांचा आधार घेण्याचा सल्ला दिला. तेव्हा मराठयांच्या दोआबात तळ असतांना वजीर शुजाउद्योला याने रामचंद्र गणेश कानडेची भेट घेतली.


काही शंका किंवा सूचना असल्यास संपर्क करा.
[email protected]


होळकरशाहीची उत्कृष्ट पुस्तके Online Order करण्यासाठी भेट द्या.
Ahilyabai Holkar Books in Marathi

राहुल वावरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *