Skip to content

किल्ले लळिंग, जि.धुळे(महाराष्ट्र)

होळकरशाहीतील दुर्ग : किल्ले लळिंग

ahilyabai-holkar
किल्ले लळींग

इतिहास :

इ.स.१७५२ मध्ये श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर(प्रथम) व मराठी सैन्याने भालकीच्या युद्धात निजामाचा पराभव केल्यानंतर हा किल्ला पहिल्यादांच हिंदवी स्वराज्यात सामील झाला. भगवं निशाण या किल्ल्यावर सन १७५२ ला पहिल्यांदाच फडकले. हिंदवी स्वराज्यात हा किल्ला होळकर संस्थानच्या अंतर्गत आला. त्यामुळे मराठी साम्राज्यात श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकरांच्या(प्रथम) अधिपत्याखाली लळिंगचा कारभार चालत असे.हा किल्ला होळकर साम्राज्याच्या अंतर्गत मराठी सत्तेचा अंतहोई पर्यंत म्हणजेच इ.स. १८१८ पर्यंत होता त्यानंतर लळिंग इंग्रजांच्या ताब्यात गेला व संपत्तीच्या प्राप्तीसाठी त्यांनी नासधूस केली. हा किल्ला १३ व्या शतकात फारुकी राजांनी बांधला आहे.

अनेक जणांना प्रश्न पडतो कि भालकीची लढाई झाली कोठे? भालकी हे कर्नाटक राज्यातील बिदर जिल्यातील एक तालुक्याचे ठिकाण आहे. या शहरात निजामाचा किल्ला होता व १७५२ ला मराठी सेन्यांनी या किल्ल्यावर आक्रमण केले व लढाई जिकून महाराष्ट्रातील व कर्नाटकातील खूप मोठा प्रदेश जिंकला. भालकी हे शहर महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमेवरील गाव असून मराठी भाषिक लोकांची संख्या तेथे मोठ्या प्रमाणात आहे.

माहिती :

लळिंग हे गाव धुळ्यातून जाणा-या मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवर वसलेले आहे. त्याचे धुळ्यापासून अंतर नऊ कि.मी., जळगावपासून १०० कि.मी., मालेगावपासून ४० कि.मी. व नाशिकपासून १४६ कि.मी. आहे. लळिंग गावामध्ये काळ्या पाषाणात बांधलेले महादेवाचे एक छोटे मंदिर आहे व त्यामागे एक पाण्याची टाकी आहे. या टाकीच्या खालूनच किल्ल्याकडे जाण्याची वाट चालू होते. स्थानिकांची व विशेषत: मेंढपाळांची येथे नियमित ये-जा असल्याने गडावर जाणारी वाट ही मळलेली आहे. थोडे अंतर चालून गेल्यावर किल्ल्याच्या पाय-यांचे भग्न अवशेष दिसून येतात. पावसाच्या पाण्याच्या रेट्याने ते अस्ताव्यस्त पडले असावेत, असे लक्षात येते. साधारणत: अर्ध्या तासाच्या चढाईनंतर दगडात बनवलेल्या काही पाय-या लागतात. त्या चढून गेले की, समोरच एक थडगे व शेवाळलेले टाके दिसते. येथून डाव्या व उजव्या अशा दोन्ही बाजूंना जाण्यासाठी रस्ते आहेत. डाव्या बाजूचा रस्ता हा फसवा आहे. तो पडझडीमुळे चुकीचा मार्ग दर्शवतो. हा रस्ता तटबंदीच्या बाहेरच्या बाजूने जातो. उजव्या बाजूचा रस्ता खालच्या तटबंदीकडून थेट मुख्य दरवाजाकडे जातो. याच वाटेमध्ये चार-पाच कातळात कोरलेली दालने दिसून येतात. पाणी साठवण्यासाठी वा राहण्यासाठी या गुहांचा वापर होत असावा. सध्या ती पूर्णपणे कोरडी पडली आहेत. मात्र पावसाळी मोसमात त्यात ब-यापैकी पाणी भरले जात असावे.

ही टाकीसदृश गुंफा मागे पडल्यावर आपण चालत या किल्ल्याच्या मुख्य दरवाजापाशी येऊन पोहोचतो. सध्या तो पूर्णपणे भग्न अवस्थेत आहे. दरवाजाच्या उजव्या बाजूला एक व्याघ्रशिल्प कोरलेले दिसते. येथून वर गेल्यावर उजव्या बाजूला गडाची तटबंदी दिसून येते .आपण गडाच्या माथ्यावर पोहोचलेलो असतो. गड पायथ्यापासून चढताना सतत एक सज्जाची कमानीयुक्त भिंत दिसत राहते. ही भिंत याच ठिकाणी दृष्टीस पडते. विटांचा व चुन्याचा वापर करून ती उभी केलेली आहे. समोरच नव्याने ध्वजस्तंभ उभारलेला आहे. त्याच्या पलीकडून मुंबई-आग्रा महामार्ग व धुळे शहराचे दर्शन होते. वातावरण स्वच्छ असताना सोनगीरचा किल्लाही येथून दिसतो.

तटबंदी पाहून पुन्हा प्रवेशद्वारापाशी आल्यावर डाव्या बाजूच्या वाटेने किल्ल्याच्या दुस-या भागाकडे जाता येते. रस्त्यात कातळात तयार केलेली एक पाण्याची टाकी आहे. त्यात उन्हाळ्याच्या ब-याच काळापर्यंत पाणी साठलेले असते. परंतु हे पाणी मात्र पिण्यायोग्य नाही. पुढच्या भागात व किल्ल्याच्या मुख्य पठारावर आणखी काही पाण्याची टाकी कातळात तयार केल्याची दिसतात. पठारावर मध्येच काहीसा उंचवटा आहे. काही ठिकाणी राहत्या घरांचे पडीक अवशेष नजरेस पडतात. या पठाराच्या चहुबाजूंनी तटबंदी बांधलेली आहे. मध्य टेकाडाच्या पोटात काही गुहा खोदलेल्या आहेत. अशा गुहांची संख्या मात्र या किल्ल्यावर बरीच दिसून येते. समोरच एक दारू कोठाराची इमारत दृष्टीस पडते. त्याच्या मागच्या बाजूला पाण्याचा मोठा खंदक व तीन-चार टाकी आहेत. समोरच दुर्गा मातेचे एक छोटेखानी मंदिर आहे. लळिंगच्या किल्ल्यावर कधी राहण्याची वेळ आली तर या मंदिराचा वापर करता येतो. परंतु, येथे केवळ दोनच जण राहू शकतात. समोरील पाण्याच्या टाक्यांना लागून एक कुंड आहे. त्यातही पाणी साठलेले असते. किल्ल्यावर येणारे मेंढपाळ जनावरांना पाणी पाजण्यासाठी या कुंडाचा वापर करतात.

मंदिराच्या मागील बाजूस पुन्हा काही कोरलेल्या गुहा दिसून येतात. या गुहांनी बरीच मोठी जागा व्यापलेली आहे. एका गुहेपाशी एक भुयार आहे. हे भुयार थेट गडाच्या गुप्त दरवाजापाशी येऊन मिळते. या दरवाजापासून खाली कातळात कोरलेले पाण्याचे टाके आहे. खाली उतरल्यावर उजव्या बाजूला एक वाट जाते. वाटेत देवीचे एक पडके मंदिर दिसते. येथूनच लळिंगच्या मुख्य माचीकडे वाट जाते. किल्ल्याच्या मुख्य बुरुजावरूनही ही माची स्पष्ट दिसून येते. माचीवर एक पाण्याचा भव्य तलाव आहे. समोरच एका घुमटीच्या खाली पाण्याची दोन टाकी आहेत. माचीचा परिसर पाहून झाल्यावर दुस-या बाजूची वाट पुन्हा किल्ल्याच्या मुख्य दरवाजाकडे जाते. येथून पुन्हा खाली मार्गस्थ होता येते. लळिंगचा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे १५०० मी. उंच असल्यामुळे तो सर करताना वा उतरताना थकवा कधी जाणवत नाही.

अन्य महत्त्वाचे :

मध्ययुगीन कालखंडात लळिंग ही खानदेशाची राजधानी होती. मुघल साम्राज्याचा विस्तार बागलाण व खानदेशात झाल्यावर लळिंग हे त्यांचे मुख्य लष्करी केंद्र म्हणून उदयास आले. इ.स. १३७० ते १३९९ या कालखंडात फारुखी घराण्यातील राजा मलिक याच्याकडे लळिंगचा ताबा होता. त्याच्या पश्चात त्याचा मुलगा मलिक नसीरखान याच्या अधिपत्याखाली लळिंगचा परिसर आल्यावर हा भाग फारुखी राजवटीचे सत्ताकेंद्र बनला. नसीरखानने असिरगड जिंकून तेथे बु-हाणपूर नावाचे शहर वसवले व इ. स. १४०० मध्ये त्याला राजधानीचा दर्जा दिला. परंतु, सन १४३५ मध्ये बहामनी सुलतानाने नसीरखानाचा पराभव केला. बु-हाणपुरात दोघांमध्ये तुंबळ युद्ध झाले. पराभवामुळे नसीरखान पुन्हा लळिंगला परतला. बहामनी सुलतानाने मात्र नसीरखानाचा पाठलाग करून लळिंग गाठले. बहामनी सुलतानाला लळिंगमध्ये मोठी संपत्ती मिळाल्याने तो ती घेऊन बिदरला निघून गेला. तशातच लळिंग किल्ल्यावर नसीरखानाचा १४३७ मध्ये मृत्यू झाला. इ.स. १६०१ मध्ये फारुखी घराण्याचे राज्य संपवून मुघलांनी या किल्ल्याचा ताबा घेतला. इ.स. 1१६३२ मध्ये मालेगावजवळील गाळणा किल्ला मुघलांच्या अधिपत्याखाली येताना झालेली शिष्टाई याच लळिंग किल्ल्याच्या साक्षीने झाली!

सन १९३० मध्ये गांधीजींनी देशभर सविनय कायदेभंगाची चळवळ चालू केली होती. त्याला पाठिंबा म्हणून लळिंगच्या पायथ्याशी हजारो भिल्ल व आदिवासी भूमिपुत्रांनी जंगल सत्याग्रहाची घोषणा केली. जंगलातील लाकूड व गवत कापून विकायचे नाही, हे इंग्रज सरकारचे धोरण त्यांनी मातीस मिळवले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी याच लळिंग किल्ल्याच्या पायथ्याला ३१ जुलै १९३७ रोजी स्त्रियांची सभा घेऊन ‘अंधश्रद्धा मोडा व आपल्या मुलांना शिकवा’ हा संदेश दिला होता. अशा विविध घटनांचा साक्षीदार लळिंगचा किल्ला आहे.

अलीकडच्या काळात सन २०१८ पासून किल्ले लळींगचा मोठ्याप्रमाणात विकास होण्यास सुरुवात झाली आहे.

माहितीसाठी आभार : दिव्यमराठी भास्कर, लोकप्रभा  
अधिक फोटो पहा : किल्ले लळिंग

राहुल वावरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *