
इ. स. १६६४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होऊन हिंदूपदपादशाहीची संस्थापना त्यांनी केली. काही काळाने मराठ्यांचे स्वराज्य भावनेचे रूपांतर मराठा साम्राज्यात झाले. त्या काळात मराठ्यांचे राजे साताऱ्याला राहात असत. इ. स. १७०७ मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर छत्रपत्री शाहूची सुटका झाली.


पुढे शाहू आणि ताराबाई यांच्यात इ. स. १७०८ मध्ये खेडचे युद्ध होऊन ताराबाईचा पराभव झाला आणि शाहू विजयी झाले. परंतु सेनापती चंद्रसेन जाधवांचा कल ताराबाईंकडे असल्याने छत्रपती शाहूंची स्थिती अस्थिर झाली. अशा वेळी श्रीवर्धन येथील बाळाजी विश्वनाथ यांनी सैन्य गोळा करून शाहू महाराजांचे शासन स्थिर करण्यासाठी कठोर परिश्रम केले.
म्हणूनच छत्रपती शाहूनी इ. स. १७ नोव्हेंबर १७१३ मध्ये मंजरी या गावी बाळाजी विश्वनाथ यांना पेशवा पदी नेमले. कारण त्यांनी पश्चिम किनाऱ्यावरील कान्होजी आंग्रे यांना बुद्धी चातुर्याने ताराबाईकडून आपल्याकडे वळविण्यात यशस्वी झाले होते.


कान्होजी सारखा दर्यावर्दी सारंग शाहू महाराजांच्या सेवेत रूजू केला. साताऱ्यास जाऊन महाराजांचे दर्शन घेतले आणि कान्होजी आंग्रे यास सरखेलची पद देऊन वस्त्रे व सिक्के कट्यार पाठविली.
बाळाजी विश्वनाथ यांनी सय्यद बंधूना मदत करून मोगल सम्राट फरूखसियरकडून इ. स. १७ मार्च १७१९ ला तीन सनदा १.स्वराज्य २.सरदेशमुखी आणि ३.चौथाई प्राप्त केल्या. ३ मार्च १७१९ रोजी चौथाई व ता. १५ मार्च १७१९ रोजी सरदेशमुखीचा करार बादशहाने करून दिला व शाहूच्या कुटुंबातील सर्व मंडळीची मुक्तता केली.

२० मार्च १७१९ रोजी बाळाजीनी दिल्ली सोडली आणि ४ जुलै १७१९ ला साताऱ्यास येऊन पोहोचले. परंतु ह्या सनदेची अंमलबजावणी होण्यापूर्वीच २ एप्रिल १७२० रोजी बाळाजी विश्वनाथांचा मृत्यू सासवड येथे झाला.
बाळाजी विश्वनाथांच्या मृत्यूनंतर १७ एप्रिल १७२० रोजी त्यांचा मुलगा बाजीराव यास पेशवा पदी नेमले. चिमाजी अप्पास पंडित ही पदवी दिली आणि दाजी थोरात कडील काढून घेतलेली सरंजाम व सरदारकी दिली. पुरंदरे यास मुतालकीची वस्त्रे दिली ह्याच गोष्टी जुन्या अनुभवी मंडळींना आवडल्या नाहीत. त्यामध्ये नागपूरचे रघुजी भोसले, श्रीपतराव प्रतिनिधी आनंदराव सुमंत, दाभाडे नाशिराम यांचा समावेश होतो.
श्रीपतराव प्रतिनिधी आणि पेशवा बाजीरावात मराठा राज्याच्या धोरणाविषयी मतभेद निर्माण झाले. अशा वेळी घरात भांडत बसण्यापेक्षा बाहेर पडावे. मराठी साम्राज्याचा विस्तार होईल. या उत्तरेकडील आक्रमक विस्तारवादी धोरणाला जुन्या जाणकार अनुभवी सरदार मंडळींचा विरोध राहील याची खात्री थोरल्या बाजीरावाला असल्यामुळेच त्याने जुन्या मंडळींना बाजूला सारून आपले नवीन धोरण अंमलात आणण्यास नवीन सरदार निर्माण केले.
बाजीरावांनी मराठा स्वराज्याचे रूपांतर मराठा साम्राज्यात केले. हे साम्राज्य निर्माण करीत असताना बाजीरावाने तरुण नवीन सरदार घडविले. त्यात राणोजी शिंदे, मल्हाराव होळकर, उदाजी पवार इत्यादी होते. राणोजी बाळाजी विश्वनाथाच्या काळापासून पेशव्यांकडे होते. शिंदे-होळकर पेशव्यांचे सरदार असले तरी पालखेडच्या मोहिमेने एकत्र आले आणि मग मात्र जोडी जमून बहुतेक सर्व स्वाऱ्यांत शिंदे-होळकर असत.

इ. स. १७२० ते १७४० पर्यंत बाजीराव पेशव्यांनी राणोजी शिंदे व मल्हारराव होळकरांच्या मदतीने मराठी राज्याचा विस्तार केला. बाळाजी पंताच्या कारकिर्दीच्या अखेरीस मल्हारराव होळकरांनी पवारांच्या मदतीने माळव्याचे राजकारण सुरू केले होते. बाळाजीने दिल्लीहून परत येताना बाजीरावास उत्तरेतच ठेवले. इ.स. १७२३-२४ च्या दरम्यान मल्हाररावांनी आपले ठाणे इंरोरास नेले आणि उदाजी पवारांनी धारचा कब्जा घेतला.
शाहिर रामदास
संपूर्ण इतिहास – राणी अहिल्यादेवी होळकरांचा समग्र इतिहास
काही शंका किंवा सूचना असल्यास संपर्क करा.
[email protected]
- राणी अहिल्यादेवी होळकर यांचा मुरूम येथील शिलालेख - November 8, 2022
- इंदोरमधील होळकरांची समाधीस्थळे – छत्री मंदिरे - April 5, 2022
- अहिल्यादेवी होळकर कालीन डाक व्यवस्था - December 31, 2021